अनर्थ टळला, मंत्री आदित्य उद्धव ठाकरे बालंबाल बचावले
# सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला.
मुंबई. (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेर झालेल्या अपघातातून ते बाचवले. अतिथीगृहाच्या बाहेर असलेले मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. अपघात झाला तेव्हा आदित्य ठाकरे आत बैठक घेत होते. त्यामुळे या घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी सायंकाळी बैठकीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथीगृहामध्ये आले होते. याठिकाणी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर सभागृहात त्यांची बैठक सुरू होती. मात्र आतमध्ये ही बैठक सुरू असताना बाहेरच्या भागात असलेले शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही दुर्घटना अत्यंत गंभीर होती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. दरम्यान, अपघात झाला त्याठिकाणचं बांधकाम हे 25 वर्षांपूर्वीचे आहे. या सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले आहे. त्या संपूर्ण इमारतीचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, संबंधित दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
हा अपघात बैठक सुरू असलेल्या सभागृहाच्या बाहेरच झाला. त्यामुळे या अपघाताच्या आधी नंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व आधिकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. बैठकीसाठी काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे या ठिकाणाहूनच आत गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा वेळ चुकला असता तर अपघाताची शक्यता होती. मात्र सुदैवाने तसे झाले नाही.