केंद्राप्रमाणे ११ टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांनाही त्वरित मिळावा – भाऊसाहेब पठाण

मुंबई. (प्रतिनिधी) – केंद्र शासनाने मंजूर केलेल्या ११ टक्के महागाई भत्त्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचा-यांनाही वाढीव महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यंमत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्र शासनाने केंद्री कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२० पासून ४ टक्के, १ जुलै २०२० पासून ३ टक्के आणि १ जानेवारी २०२१ पासून ४ टक्के असा एकूण ११ टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर केला आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण २८ टक्के इतका महागाई भत्ता झाला आहे. केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता वाढ राज्यात देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र हा निर्णय घेण्यात उशीर होत असल्यामुळे थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीतील ५ महिन्यांची थकबाकीदेखील अद्याप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे
राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. तरी थकबाकीमुळे महागाई भत्त्याचे प्रमाण वाढत असून दिवसेंदिवस आर्थिक व्यवहारामध्ये होत असलेल्या महागाईला कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याने महागाई भत्त्याची मागील ५ महिन्यांची थकबाकी तसेच केंद्राप्रमाणे झालेली ११ टक्के महागाई भत्ता वाढ त्वरित देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही महासंघाने घेतली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांनाही दिली गेली आहे. संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकू साळुंके, सरचिटणीस प्रकाश बने यांनी दिली आहे.