आम्ही व्यापारी उध्वस्त झालो आहोत ; दादा, तुम्हीच आमचे वाली, तुम्हीच, आमचे प्रश्न सोडवू शकता
# व्यापाऱ्यांनी आपल्या भावना मांडताना दाखवला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विश्वास
चिपळूण. (संतोष सावर्डेकर) –‘ आमची कमाई संपली आहे. आम्ही व्यापारी उध्वस्त झालो आहोत. आता दादा, तुम्हीच आमचे वाली आहात. तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, असा असा विश्वास चिपळुणातील व्यापाऱ्यांनी चिपळूण बाजारपेठेतील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी आपल्या भावना मांडताना विश्वास व्यक्त केला. तर आपल्या भावना समजल्या असून आपले प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाही राणे यांनी यावेळी व्यापाऱ्यांना दिली.
महापुरामुळे चिपळूणवासीय उद्धवस्त झाले आहेत. पुरानंतर परिस्थिती भयावह आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी सोबत विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार व भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, माजी जलसंपदा मंत्री व आ. गिरीश महाजन, आ. निरंजन डावखरे, उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासमवेत चिपळूण बाजारपेठेतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मांडल्या.

यावेळी व्यापारी म्हणाले की, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पुरावेळी आठ बोटी तरंगत होत्या. हे यांचं व्यवस्थापन ! या अगोदर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तेव्हा १४४ कलम लागू करून पोलीस बंदोबस्तात दुकानातील परवानगी दिली होती. मात्र, रेड अलर्टचा इशारा देऊनही येथील प्रशासनाने आम्हाला कोणतीही सूचना दिली नाही. आम्हाला जर अलर्ट केले असते तर इतके आमचे नुकसान झाले नसते. आमच्या नुकसानीला प्रशासन जबाबदार आहे. तसेच शेतकऱ्यांप्रमाणे आम्हाला सरसकट कर्ज माफी, मिळावी आणि ती तात्काळ मिळाली पाहिजे, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांच्याकडे केली. यावेळी व्यापारी पुढे म्हणाले की, प्रांत मंत्री सामंत सोबत फिरतात. काल आम्हाला पाणी नव्हते. तरी प्रांत मंत्र्यांसोबत फिरत होते. त्यांच्यावर अगोदर कारवाई करा, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी प्रांतांधिकार्यांविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे तक्रार केली. तर नुकसानी विषयी म्हणाले की, इन्शुरन्स कंपनीवाले त्रास देतात. या कंपनीकडून आम्हाला १०० टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या कंपन्यांकडून आम्हाला तात्काळ २० टक्के नुकसान भरपाई मिळावी, कागदपत्रे नंतर बघा म्हणावं, यासाठी प्रयत्न व्हावेत. आमची कमाई संपली आहे. आम्ही व्यापारी उध्वस्त झालो आहोत. दादा, तुम्हीच आमचे वाली आहात. तुम्हीच आमचे प्रश्न सोडवू शकता, असा विश्वास आपल्या भावना मांडताना या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर, कार्याध्यक्ष किशोर रेडीज, खजिनदार उदय ओतारी, अरुण भोजने, सूर्यकांत चिपळूणकर आदी व्यापारी तसेच नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, अशिष खातू, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे, शौर्य निमकर, शुभम पिसे, महेश कांबळी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.