अपरांत कोविड रुग्णालयातील ८ रुग्णांचा मृत्यू, तर अन्य ठिकाणी ४ नागरिकांचा बळी
# चिपळुनात महापुरामुळे व्यापारी नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
बहादुरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील व एनरॉन पूल खचला, घरे बुडाली पाण्याखाली
चिपळूण. (संतोष सावर्डेकर) – २६ जुलै २००५ च्या महापूरापेक्षा भयाण महापूर चिपळूणवासीयांनी अनुभवला. या महापुराने चिपळूणवासीयांच्या सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बहादुरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील व एन्रॉन पूल खचला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. महापुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना एनआरडीएफ, कोस्टगार्ड, आर्मी, पोलीस यांच्या तुकड्यांसह चिपळूण, रत्नागिरी, मालवण येथील तरुणांनी सुरक्षित स्थळी हलविले. या महापुरात १२ नागरिकांचा बळी गेला असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. तर हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी पहाटेपासून भरलेला महापूर खेर्डी, चिपळूण शहरातील काही भाग वगळता बाजारपेठेसह पेठमाप, गोवळकोट भागात पूर ओसरला नाही. यामुळे येथील नागरिकांना शुक्रवारी दूध, नाष्टा एनआरडीएफच्या तुकड्यांसह अन्य पथकांनी पोहोचविला. या भयाण महापुरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे वाशिष्टी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गुरुवारी पहाटे पासून चिपळूणसह खेर्डीमध्ये पूर भरण्यास सुरुवात झाली. नंतर हळूहळू पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने संपुर्ण चिपळूण शहर पुराने वेढले गेले. खेर्डीतही तिच परिस्थिती निर्माण झाली. प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी दोन्ही अधिकारी पुरात अडकले. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. चिपळूण-खेर्डीमध्ये पूर इतका वाढला की, सुरुवातिला घरांमध्ये पाणी शिरले इतकेच नव्हे तर घरांच्या पोटमाळ्यापर्यंत पाणी पोहोचू लागले. यामुळे या घरांमधील नागरिकांनी जीवाच्या आकांताने मदतीसाठी टाहो फोडू लागले. तर दुसरीकडे इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. यामुळे नागरिकांनी टेरेस गाठला. या भयाण महापुरामुळे पुरात अडकलेले हजारो नागरिक मदतीसाठी याचना करू लागले. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात तितकीशी यंत्रणा नव्हती. नंतर आमदार शेखर निकम यांच्यासह सचिन कदम, नगरसेवक उमेश सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते नाजीमभाई अफवारे आदींनी पुढाकार घेतला. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, नायब तहसिलदार तानाजी शेजाळ, मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चिपळूणवासियांच्या पुरात अडकलेल्याना सुरुवात केली. मात्र, सुमारे १५ ते २० फूट पाणी असल्याने काही ठिकाणी शक्य झाले नाही. जिथे शक्य होते. तेथील नागरिकांना बाहेर काढले. मजरेकाशी, पेठमाप, गोवळकोट, बाजारपेठ येथील नागरिकांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. महापुर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांच्यासह प्रशासनाने एनआरडीएफसह आंर्मी, कोस्टगार्ड पथक व बोटीना पाचारण केले. तोपर्यंत जिकडे तिकडे पुरात अडकलेले नागरिक मदतीसाठी याचना करीत होते. गुरुवार संध्याकाळ होत आली तसं तसे सर्वांचा जीव भांड्यात पडत होता. सर्व बाजूने मदतीसाठी टाहो सुरू होता. दरम्यान, संध्याकाळी उशिरा एनआरडीएफ नौदल, आर्मी, कोस्टगार्डसह अन्य पथके यामध्ये हेलपिंग हॅन्ड, रत्नदुर्ग माऊटेनिअर्स, राजू काकडे हेल्प फाऊंडेशन, जिद्दी माऊटेनिअर्स आदींनी बचावकार्यास सुरुवात केली. या सर्वांनी शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. अपुरा वेळ आणि बचाव कार्यात अडथळ्यांमुळे पुन्हा शुक्रवारी सकाळी बचाव कार्यास सुरुवात झाली. तोपर्यंत पुरात अडकलेल्या चिपळूण शहरासह खेर्डी, बहादुरशेखनाका, कळबसते येथील नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन इमारतींच्या टेरेसवर, घरांच्या छतांवर, पोटमळ्यात रात्र अक्षरश: जागून काढली. महापुरामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने चिपळूण व सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इमारतींमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली. तसेच या ठिकाणी अन्न पुरवठा, पिण्याचे पाणी व बेडसची व्यवस्था करण्यात आली.
# एकमेकांस सहाय्य करू, या उक्तीप्रमाणे एकमेकांना मदत’
चिपळूणसह, खेर्डी, कळबसते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात २६ जुलै २००५ च्या पुरापेक्षा पाण्याची पातळी असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक इमारतीच्या टेरेसवर गेले. यावेळी सर्वांनी आपापल्या पध्दतीने भोजन व्यवस्था करून एकमेकांना दिलासा दिला. जे लोक सुरक्षित स्थळी होते. त्यांनी महापुरात अडकलेल्या पण जाणे शक्य आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना चहा, नाश्ता, जेवण पुरविले. इतका एकमेकांना दिलासा दिला. तर दुसरीकडे प्रशासनाला देखील मोठे सहकार्य केले आहे, याबाबत चिपळूणवासीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
# शुक्रवारी सकाळी पाणी ओसरले पण…!
गेल्या दोन तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे गुरुवारी पहाटे चिपळुनात आलेला महापूर हा शुक्रवारी पहाटेपर्यंत जैसे थे होता. दरम्यानच्या काळात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. शुक्रवारी सकाळी हळूहळू पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. यामध्ये खेर्डी, चिपळूण-काविळतळी, मार्कडी, बहादुरशेखनाका, महामार्ग रेडिज पेट्रोल पंप परिसर, चिपळूण-गुहागर बायपास रोड देसाई बाजारपर्यत, विरेश्वर तलाव परिसर, भोगाळे पर्यत पाणी ओसरले. मात्र, चिंचनाका ते बाजारपेठ परिसरातील पाणी ओसरले नाही. जिथे जिथे पाणी ओसरले होते. तेथील परिस्थिती भयाण होती. दुकानांमध्ये चिखलमय पाणी यामुळे मालाचे झालेले नुकसान, तर वाहने इतरत्र फेकली गेलेली, यामधून अवजड वाहने देखील सुटली नाहीत. काही वाहने गटारात जाऊन कलंडली. तर काही वाहने एकमेकांवर आढळून या वाहनांचे नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले. ही परिस्थिती जिकडे तिकडे दिसून आली. यामुळे व्यापारी व गाडी मालकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. तसेच इमारतीच्या पार्किंग जागेत व घरांमध्ये शिरलेले चिखलमय पाणी बाजूला करताना नागरिकांची दमछाक दिसून आली. एकंदरीत पाणी ओसरले. मात्र, म्हपु7झालेल्या भयाण परिस्थितीमुळे अंगावर काटा उभा राहत होता. तर आता सारे या परिस्थितीतून बाहेर कसे पडणार ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. या महापुरामुळे चिपळूणवासीय उध्वस्त झाला हे खरे! आता शासन किती मदत करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
# बहादुरशेख व एनरॉन पूल खचला आणि वाहतूक पडली बंद
अतिवृष्टी आणि महापूर यामुळे वाशिष्टी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बाजारपेठेतील जुना व नवीन बाजारपुलावरून पाणी गेलेच तर बहादुरशेखनाका येथील पुलाला पाणी टेकल्याने ही नदी तुडुंब भरून वाहू लागली. तर हा परिसर जलमय झाला. याचा फटका या पुलाला बसला आणि अप्रोच खचला. सुदैवाने अतिवृष्टी आणि महापुरामुळे हा पूल अगोदरच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दुसरीकडे एनरॉन पूल खचल्याने समोर आले असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बहादूरशेख पूल खचल्याचे लक्षात आल्यानंतर चेतक-रिगल कंपनीने तात्काळ पुलाचा खचलेला भाग भरण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगण्यात आले आहे. चिपळूण-गुहागर बायपास मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. मात्र, ही दरड बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, तोपर्यंत या तिन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहिली व अजूनही आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईकडे जाणारी वाहतूक रखडली आहे.
# आमदार शेखर निकम सर्व परिस्थितीवर ठेवून होते लक्ष
चिपळुनात महापूर भरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी चिपळूण गाठत प्रशासन व कार्यकर्त्यांच्या मदतीने पुरात अडकलेल्यांसाठी जेवढे काही मदत करता येईल, यासाठी मदतकार्य सुरू केले. पुरात अडकलेले पण सुरक्षित स्थळी असलेले अथवा पुरातून बाहेर काढणाऱ्या नागरिकांसाठी जेवण पॅकेट, बिस्किटे, पाणी बॉटलची व्यवस्था केली. यासाठी शिक्षक मित्र प्रतिष्ठानचे सतीश सावर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते देवराज गरगटे यांसह सावर्डेतील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. एकंदरीत शेखर निकम सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
# महापुरामुळे १२ नागरिकांचा बळी
महापुरामुळे पेढे येथील घरावर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. तर खेर्डी येथे घरात पाण्यामुळे गुदमरून व बुडून, अपरांत कोविड सेंटरमधील आठजण व इंद्रिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात एक असे १२ जणांचा बळी गेला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या महापुरामुळे जनावरे, घरातील साहित्य वाहून गेले आहे. या सर्व परिस्थितीमुळे चिपळूणवासिय भयभीत झाले आहेत. कधी नव्हे इतकं महापुराला चिपळूणवासियांना सामोरे जावे लागले आहे.
# लोकप्रतिनिधींकडून पाहणी
शुक्रवारी सकाळी बऱ्यापैकी पूर ओसरल्यानंतर ना. उदय सामंत यांच्यासह आमदार शेखर निकम, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह काहिनी खेर्डी व चिपळूण शहरातील काही भागाची पाहणी करीत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करावेत. “तर व्यापाऱ्यांचे नुकसान पाहता इन्शुरन्स कंपन्यांना योग्य ते निर्देश दिले जातील, असे सांगण्यात आले. तर या कंपनीच्या उद्या बैठक घेतली जाणार आहे, असे देखील यावेळी स्पष्ट केले आहे.
ग्रामीण भागातील नद्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काही गावातील पुलाना पुराचा फटका बसला असल्याचे सांगितले जात आहे. वीज पुरवठा खंडित आहेच शिवाय मोबाईल सेवेचाही बोजवारा उडाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूदेखील मिळणे काही दिवस तरी अवघड होणार आहे. वीज पुरवठा खंडित असल्याने नळपाणी योजनेवर परिणाम झाला असून नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर वाहनांमध्ये पाणी गेल्याने हजारो वाहने नादुरुस्त झाली आहेत. चिपळूणवासीयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर प्रशासनासमोर नुकसानग्रस्तांना अर्थिक मदत मिळवून देण्याचे आव्हान आहेतच तर रोगराई पसरू नये, यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी येथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला.