निरोगी आरोग्यासाठी पोषक आहाराची भूमिका महत्वाचे असल्याचे प्रतिपादन – गृहविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. प्रणीता कडू
# क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोच्या वतीने पोषण आहाराची गुढी आणि वृक्षारोपण करण्यात आले : राष्ट्रीय पोषण मेळावा संपन्न
अमरावती. ( प्रतिनिधी ) – दैनंदिन आहारात विभिन्न घटकांच्या कमतरतेमुळे किंवा अयोग्य प्रमाणामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि त्यामुळे विविध रोग उद्भवतात. तसेच असंतुलीत आहारामुळे शारीरिक व मानसिक क्षमता कमी होऊन व्यक्तीचे, समाजाचे पर्यायाने देशाचे आरोग्य धोक्यात येते. या करिता सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन घातखेड कृषि विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शात्रज्ञ डॉ प्रणीता कडू यांनी आज येथे केले. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेले क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अमरावती व एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय, वरुड यांच्या सयुंक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियानावर आयोजित पोषण मेळाव्यात बोलत होत्या.
याप्रसंगी डॉ. सोनारे म्हणाले की, सर्वांनी दररोज पोषक आहार घ्यावे आणि नियमित योगाभ्यास करावे जेणेकरून आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. योगाचे आठ प्रकार आहेत. त्यामध्ये प्राणायम, ध्यानमुळे मानसिक तणाव कमी होतो. डॉ. लुम्बिनी गणवीर यांनी म्हणाले की, पोषणाच्या अभावाचे परिणाम समाजावर आणि परिणामी देशावर होत असतातत. उदा बालमृत्यू दर वाढतो, सामान्य मृत्यूदरात वाढ होते, आजारांचे प्रमाण वाढते, आयुष्य मर्यादा कमी होते. तसेच अयोग्य पोषणाने आणि अतिपोषणामुळे होणारा लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्राशयाचे विकार, इत्यादि मुळे विविध गुंतागुंती उद्भवतात. त्यामुळे आहार आणि पोषणशास्त्र यांची मुलभुत माहिती समाजातील सर्व घटकांना होणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन व माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. अंगणवाडी सेविका व किशोरवयीन मुलींची गावातून पोषण जागरूकता रॅली काढण्यात आली. रॅलीला सरपंच रजनी कुबडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. सही पोषण देश रोशन, अंगणी लावा एक तुळस, प्राणवायूचा होईल कळस, पोषक आहार देऊया, सुदृढ बालक बनवू या अश्या विविध घोषणांनी संपूर्ण परिसर पोषणमय केला. अंगणवाडी सेविका कडून कार्यक्रमच्या स्थळी ग्रामस्थांना माहिती होण्यासाठी विविध फळाफुलांची पोषण गुढी उभा करण्यात आली होती. पोषण अभियानात किशोरवयीन मुली व् महिलांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी रांगोळी, पाककृती आणि प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांचा हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील रंगधून कला मंडळाच्या समीर आणि सदस्यांकडून पोषण अभियानावर पारंपरिक भारुडचे सादरीकरण करण्यात आले. पोषण वाटिका अंतर्गत लोकांना परसबागेचे महत्व पटवण्यासाठी ग्रामपंचायत परिसरात शेवग्याच्या झाडाचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास यादव यांनी तर आभार प्रदर्शन चंचल बेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशसवतेसाठी बाल विकास प्रकल्प वरुड कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.
यावेळी मंचावर सरपंच रजनीताई कुबडे, पंचायत समिती सदस्य शिल्पा पवार, उपसरपंच गोपालराव नांदूरकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, वरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ चरणदास सोनारे, डॉ लुम्बिनी गणवीर, बाल विकास प्रकल्प अधिकारी राजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.