ब्रेकिंग

वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

# नायगाव पोलिस वसाहतीतील कुटुंबियांची घेतली भेट

मुंबई. (प्रतिनिधी) – गेली वर्षोनुवर्षे नायगाव पोलिस वसाहतीत राहणा-या पोलिस कुटुंबियांना आज अचानक घरे खाली करण्याकरीता बजाविण्यात आलेली नोटीस म्हणजे महाविकास आघाडी सरकारची मोगलाई पध्दत आहे. या जुलमी कृतीमागे सरकारचा काही तरी डाव दिसत आहे. पण आम्ही एकाही पोलिस कुटुंबाला बेघर होऊ देणार नाही. पोलिस बांधवांच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. पोलिस कुटुंबियांना घरातून बळजबरीने बाहेर काढण्यासाठी जर सरकारने बुलडोझरचा वापर केला तर आम्ही त्या बुलडोझरच्या खाली आडवे येऊ असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.

नायगाव पोलिस वसाहतीमधील पोलिस कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस सरकारकडून बजावण्यात आल्यामुळे येथील पोलिस बांधव अस्वस्थ झाले. ही माहिती मिळताच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने नायगाव पोलिस वसाहतीला भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते. पोलिस बांधावांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकून घेतले व त्यांना धीर दिला. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, पोलिसांना घर सोडण्यास सांगितले जात आहे, पण त्यांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. कोविड काळ असो की सण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अविरत मेहनत करुन जनतेचे संरक्षण करणारा माझा पोलिस रस्त्यावर राहणार का? आम्ही असे होऊ देणार नाही. प्रसंगी त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करु. राज्य सरकार पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी लागणा-या आवश्यक निधीपासून पळ काढत असेल तर गरज पडल्यास येथील राहिवाशांसाठी विधानसभेतील आमदार मिळून एकत्रित निधी दुरुस्तीसाठी देऊ परंतु पोलिस बांधवांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढू देणार नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी याप्रश्नी बोलणे झाले. जर या प्रश्नामध्ये काही मार्ग निघाला नाही तर फडणवीसजी स्वतः येऊन या प्रकरणाची दखल घेतील. त्यामुळे सरकारने बुलडोझर लावले तर त्या खाली आडवे पडायलादेखील आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.

# राज्य सरकारचा दुजाभाव
आयपीएस अधिकाऱ्यांसाठी या जागेत मोठे टॉवर बांधायचे आहेत. त्यामुळे सरकारला आयपीएस अधिका-यांची काळजी आहे. मात्र दिवस-रात्र परिश्रम करणाऱ्या पोलिसांची काळजी सरकारला नाही. राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचे या प्रकरणावरुन दिसून येत आहे. या कारवाईमागे काही कट असेल तर तो आम्ही सफल होऊ देणार नाही. मोठे पगार घेणारे आयपीएस अधिकारी आपल्या राहण्याची सोय करू शकतात, परंतु अल्प वेतन असणारे पोलिस बांधव मात्र आपल्या वेतनामधून साधे झोपडेसुद्धा घेऊ शकत नाही. याचा विचार नोटिस बजावताना सरकारने करायला हवा होता, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

# कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
आज पालकांच्या विरोधात घोषणा द्यावी लागत आहे. जे पालक असतात, मायबाप असतात त्यांच्याविषयी जर मनात शंका निर्माण झाली तर यापेक्षा दुर्दैव नाही. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे असून पोलिस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील आहेत. जर त्यांच्या विषयीच पोलिस खात्यातील महिला आणि येथील रहिवासी संशय व्यक्त करत असतील तर हे दुर्दैवी आहे. पालकत्व म्हणून त्यांनी पोलिस बांधवांची काळजी घेण्याची आवश्यकता होती, मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशा प्रकारे स्वतःच तुम्ही येथे कारवाई करत असून यामुळे या प्रकरणात संशय निर्माण होत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे