केंद्रातील भाजपाचे सरकार बेईमान – सिकंदर शहा
# शेतकऱ्यांना मवाली संबोधणाऱ्या मिनाक्षी लेखी यांच्या वक्तव्याचा निषेध
यवतमाळ. (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना गुलामीत टाकणारे कृषी कायदे पारीत करण्यात आले. आता तर त्यांचे म्हणने एैकून घ्यायचे सोडून केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी शेतकऱ्यांना मवाली संबोधले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेत आलेले भाजपाचे सरकार बेईमान असल्याची कडवट टिका शेतकरी नेते तसेच शेतकरी वारकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केली आहे.
केंद्राने कुठलीच चर्चा न घडविता पारीत केलेल्या काळया कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहे. यावेळी तर शेतकऱ्यांना शेतात असायला पाहीजे, मात्र केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेती सोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले आंदोलन कदाचित एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे आंदोलन असावे. भाजपा सरकारने देशभर दबंगशाही सुरु केली आहे. कुठलेही चर्चासत्र न घडविता कृषी कायदे पारीत केले. यामध्ये शेतकऱ्यांचे मत सुध्दा जानून घेण्यात आले नाही. असे असतांनाही हे काळे कायदे परत घेण्यात आलेले नाही. सरकार चालवितांना गरीब जनतेचा, शेतकऱ्यांचा विचार करणे आवश्यक आहे. केंद्रातील सरकार मात्र असा कुठलाच विचार करतांना दिसून येत नाही. महागाई तर उच्च स्तरावर गेली आहे. पेट्रोल, डिझल चे भाव वाढल्याने ट्रान्सपोर्ट चा खर्च प्रचंड वाढला असून त्यामूळे सर्वच वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहे. शेतकऱ्यांना खर्चाच्या दिडपट भाव देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजपाचे सरकार आज बेईमानीवर उतरले आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्यांची थातुरमातुर चर्चा करुन बोळवण केली जात आहे. वास्तविक संसदेत या कृषी कायद्यांवर चर्चा करणे गरजेचे असल्याचे मत सिकंदर शहा यांनी व्यक्त केले आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळाल्यास शेतकऱ्यांची अडचण दुर होऊ शकते मात्र सरकार पन्नास शंभर रुपये हमीभाव वाढवून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न करीत आहे. बियाणे, खते यांच्याही किंमती गगनाला भिडल्या आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना केंद्रातील भाजपा सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायचे सोडून आता केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी शेतकऱ्यांना मवाली संबोधले. या वक्तव्याचा सुध्दा शेतकरी वारकरी संघटनेने निषेध केला असून आता हे सरकार खाली खेचण्याशिवाय पर्याय नसल्याची टिका सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.
# शेतकरी आंदोलकांच्या पाठीशी
महाराष्ट्रातील मोठया संख्येत शेतकरी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्यात कोरोना संबंधीत कायदे लागु असल्यामुळे त्यांना दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होता येत नाही. मात्र परीस्थिती अनुकूल झाल्यास महाराष्ट्रातील लाखो शेतकरी दिल्लीला धडक देऊन सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी स्पष्टोक्ती सुध्दा सिकंदर शहा यांनी दिली आहे.