राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार रुपये द्यावेत – धनंजय महाडिक
# पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने १५ हजारांची मदत करावी, तर व्यापारी-विक्रेत्यांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम द्यावी.
कोल्हापूर. (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने कोल्हापुरातील शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून निघण्यासारखे नाही. मात्र त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने १५ हजार रुपयांची मदत करावी आणि ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा कुटुंबांना ५० हजार रुपये द्यावेत. तर व्यापारी आणि दुकानदारांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केली.
महापुरामुळे सर्वसामान्य माणसांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरलेल्या बहुतांश नागरिकांनी नातेवाईक, मित्रमंडळींकडे आश्रय घेतलाय. पण महापुरामुळे त्यांचे जे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे, ते भरून निघण्यासारखे नाही. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला तातडीने १५ हजार रूपये दयावेत आणि ज्या घरांची पडझड झाली आहे, त्यांना ५० हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा वारंवार फटका बसत असून, महानगरपालिकेचे कचखाऊ धोरण महापुराला जबाबदार आहे, असा दावाही भाजपच्यावतीने करण्यात आला. २०१९ सालच्या महापुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतर लोकांनी धडपड करून, कष्ट करून, कशीबशी परिस्थिती सावरली. आता पुन्हा आलेल्या महापुरामुळे या कुटुंबांचे कंबरडें मोडले आहे. अशावेळी पंचनाम्याची किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया बाजूला ठेवून, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांना शासनाने तातडीने मदत दयावी, तसेच ज्या व्यापारी आणि दुकानदारांना महापुराचा फटका बसलाय. त्यांनाही नुकसानीच्या किमान २५ टक्के रक्कम भरपाई म्हणून दयावी, अशी मागणी महाडिक यांनी केली.