ब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंदवी स्वराज्य म्हणजेच “हिंदूराष्ट्र” – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

मुंबई. (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

यावेळी डॉ. भागवत म्हणाले की, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांनी दिल्लीला खडावून सांगितले की हिंदू-मुस्लीम दोघांना देवांने निर्माण केले आहे. राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते की दोघांना समान पाहावे आणि अन्याय करून नये. तुम्ही असं करत असला तर मला माझी तलवार घेऊन उत्तरेत यावे लागेल. या देशाप्रती नातं असणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी सुरक्षित केले. त्याच हिंदवी स्वराज्याला आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असे भागवत म्हणाले. भारतात लोकशाही असल्याने राजकीय मतभेद, सत्तेसाठी स्पर्धा, परस्परांवर टीका होणारच. मात्र, सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेमध्ये विसंवाद निर्माण होणार नाही आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा.

देशातील अनेक ठिकाणी अंतर्गत वाददेखील आहेत. भाषा, पंथ-संप्रदायांवरून विवाद, सवलतींवरून वाद आहेत व आपापसातच हिंसा करतो आहे. आपण शत्रूंना आपले बळ न दाखवता आपापसात लढत आहोत. आपण एक देश आहोत याचा विसर पडतो आहे. याला प्रोत्साहन देणारे अनेक लोक आहे. राजकारणात विविध पक्ष राहतील व सत्तेसाठी स्पर्धा असतेच. मात्र त्याचीदेखील मर्यादा असतेच. त्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा. मात्र तो विवेक काही राजकारण बाळगत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सामान्य जनता दुःखी होत आहे, त्यांना हे लोक दिसत आहे. देशाची अखंडता कायम ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दोषारोपण करून काहीच साध्य होणार नाही.

आपल्या मनात मधल्या काळात जातीपाती, संप्रदायांवरून भेदभाव निर्माण झाला. मात्र बाहेरून आलेले लोक आता आपलेच झाले आहेत. बाहेरच्यांशी असलेला संबंध विसरून या देशात त्यांनी रहायला हवे. आपणदेखील त्यांच्याशी आपलेच समजून वागले पाहिजे व ते कुठे चुकत असतील तर त्यांचे प्रबोधन करायला हवे. मात्र या भेददृष्टीमुळे नाहक नुकसान होते. आपल्या स्वार्थासाठी भारतात कलह निर्माण करण्याचा काही बाहेरील लोक प्रयत्न करतात. त्यांना संधी मिळते व ते वाद वाढविण्यासाठी कुचक्र रचतात. सत्य स्थितीला जाणून, भूतकाळ-वर्तमानकाळातील स्थिती समजून सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. अहंकार, मतभेदांमुळे भूतकाळाचे ओझे आपण आपल्या मनावर ठेवले आहे. त्यातूनच आपण समरस होण्यास घाबरतो. संपूर्ण भारत मातृभूमी आहे. त्यात समरस झाल्याने कुणाचीही ओळख मिटणार नाही. भारतात सर्वांची विशिष्ट ओळख सुरक्षित आहे. भारताबाहेर असे चित्र दिसत नाही. तेथे विशिष्ट ओळख दिसली तर नागरिकांचे जगणे कठीण होते. स्पेन, मंगोलियामध्ये मुस्लिमांचे आक्रमण झाले. तेथील लोक जागृत झाले व त्यांनी तेथे बदल घडवून आणला. आपल्या देशात इस्लामची पुजा सुरक्षितपणे करता येते. सहजीवन अनेक शतकांपासून सुरू आहे. मात्र ते न पाहता भेदभावाचे धोरण चालविणे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा. असेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे