पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी – रामदास आठवले
...पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निर्णय स्वागतार्ह !
मुंबई. ( प्रतिनिधी ) – 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचा आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी गरिबांना येत्या दिवाळी पर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे मोदी सरकार असल्याची प्रचिती देणारा हा निर्णय असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी मे जुन महिन्यात पी. एम. गरीब कल्याण अन्न योजनेतून अन्नधान्य गरिबांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता जून महिन्याच्या पुढे दिवाळी पर्यंत या योजनेचा विस्तार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याण दृष्टी चे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत असे ना रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर सतत टीका करीत होते मात्र मोफत लस देण्याचा आणि गरिबांना अन्नधान्य वाटपाचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला असल्या मुळे महाविकास आघाडी चे तोंड बंद झाले आहे असा टोला रामदास आठवले यांनी लगावला. महाराष्ट्रात मात्र शिवभोजन योजनेव्यतिरिक्त गरीब गरजूंना कोणतीही मदत अद्याप राज्यशासनाद्वारे मिळालेली नाही. राज्यातील कलावंत शाहीर गायक तमाशा कलावंत हाल अपेष्टा काढत आहेत. त्यांना राज्य सरकार ने तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे. मागील वर्षाभरापासून राज्य शासनाने कोरोना च्या संकटकाळात लॉकडाऊन च्या बिकट दिवसांत गरिबांना कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. राज्यातील गरीब गरजूंना राज्य सरकार ने त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. महाविकास आघाडी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना भरीव मदतीचे त्वरित वाटप करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.
देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महाराष्ट्रात तर मोठया प्रमाणात कोरोनाचा कहर वाढला आहे.महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यात कडक निर्बंध लागले आहेत. लॉकडाऊन लावण्यात आला आहे.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मोलमजुरी मिळत नाही. रोजगार बुडाला आहे.त्यामुळे गरिबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे.गरिबांचे हे दुःख नेमके ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण अन्नयोजने द्वारे देशभरातील 80 कोटी गरिबांना दिवाळी पर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आणि गरिबांप्रति त्यांची कटीबद्धता दाखविणारा निर्णय आहे अशा शब्दांत रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.